रविवार, १४ फेब्रुवारी, २०२१

महाडमध्ये लवकरच नगरपालिकेची प्रशस्त इमारत

 महाडमध्ये लवकरच नगरपालिकेची प्रशस्त इमारत 

महाड , ता .१४

दीडशे वर्षांहून अधिक वर्षांची परंपरा असलेल्या महाड नगर परिषदेची 8 कोटी रुपये खर्चुन बांधलेली प्रशासकीय इमारत महाड शहरातील शिवाजी चौकामध्ये उभी राहत आहे . या इमारतीमुळे कर्मचाऱ्यांच्या जागेचा प्रश्न सुटणार असून कामकाजही सुलभतेने होणार आहे .

ऐतिहासिक महाड शहराचा विकास आता झपाट्याने होऊ लागला आहे. शहरालगतच्या महाड औद्योगिक क्षेत्र असल्याने महाड मधील बांधकाम व्यवसाय व इतर व्यापाराला चालना मिळू लागली आहे. त्यामुळे महाड शहरातील नगरपालिकेचे कामकाजही वाढू लागले आहे. महाड नगरपरिषदेला दीडशे वर्षाचा इतिहास असून शहरातील तांबट विभागांमध्ये नगरपालिकेची जुनी मजबूत इमारत आहे .परंतु या इमारतीची जागा काळानुसार आता अपूरी पडू लागली आहे. तसेच पालिकेच्या आवारा मध्ये वाहने पार्किंगसाठी जागा नसल्याने तेथे येणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होत असते. पालिकेच्या सर्वसाधारण सभेसाठी प्रशस्त असे सभागृह नाही. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून महाड नगरपालिकेची प्रशासकीय भवन असावे. यासाठी नगरपालिकेचा प्रयत्न सुरू होता. परंतु आता हा प्रश्न सुटला आहे महाड नगरपालिकेने शहरातील छं .शिवाजी चौकात म्हणजेच मध्यवर्ती ठिकाणी नगरपालिकेचे भव्य प्रशासकीय भवन उभारले आहे. या इमारतीचे इंटेरियरचे काम होणे बाकी  असून काही महिन्यातच नगरपालिका नवीन प्रशासकीय इमारतीत स्थलांतरित होईल. या नगरपालिकेच्या इमारतीसाठी पालिकेच्या विकास निधीतून सात कोटी 70 लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत .याशिवाय इंटेरियर साठी साडेसहा कोटी रुपये खर्च होणार असून यासाठी तांत्रिक मान्यता घेण्यात आलेली आहे. लिफ्टचे काम सुरू करण्याच्या निविदाही मागविण्यात आलेल्या आहेत. या नगरपालिकेच्या इमारतीत प्रशस्त असा प्रशासकीय विभाग असेल. शिवाय तळमजल्यावर गोदाम. विविध खात्यांच्या सभापतीसाठी कक्ष. नगराध्यक्ष यांसाठी स्वतंत्र कक्ष तसेच सर्वसाधारण सभेसाठी मोठे सभागृह, अभिलेख कक्ष व दोन विश्रामगृह असा या इमारतीमध्ये समावेश असणार आहे याशिवाय इमारतीच्या परिसरामध्ये पार्किंगची व्यवस्था असल्याने येथे येणार्‍या नागरिकांची ही सोय होणार आहे. नगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारती मुळे पालिकेतील कामकाज सुलभ व जलद गतीने होण्यास मदत होणार आहे

......

नगरपालिकेच्या प्रशासकीय भवनाचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. इंटेरिअर डिझायनिंग साठी तांत्रिक मान्यताही घेण्यात आलेली आहे .लवकरच या ठिकाणी नगरपालिकेचे कार्यालय स्थलांतरित होईल _  सुहास कांबळे (नगर अभियंता ,महाड नगर परिषद )

महाड मध्ये दोन वासुदेवांची स्वारी पोलिस ठाण्यात

 महाड मध्ये दोन वासुदेवांची स्वारी पोलिस ठाण्यात

महाड, ता .१३

गाव जागवत येणाऱ्या वासुदेवांच्या स्वारीला महाडमध्ये मात्र पोलिस ठाण्याची वारी करावी लागली आहे . वृध्देची फसवणूक केल्या प्रकरणी दोघा वासुदेवांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

महाड शहरामधील घरात एकटीच असलेल्या वृद्ध महिलेला करणी दूर करण्याच्या बहाण्याने पैसे घेतल्या प्रकरणी  शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे पहाटे लोकांना आपल्या मधुर वाणीने जागे करणाऱ्या वासुदेवावर फसवणूक केल्यामुळे पोलीस ठाण्याची पायरी चढावी लागली आहे.महाड शहरातील तांबड भुवन परिसरात 12  फेब्रुवारीला  दोघा वासुदेवांनी तक्रारदार दीपक रामचंद्र पवार यांची सासू प्रज्ञा प्रफुल्ल गुरव या घरात एकट्या असल्याचे पाहून त्यांचा विश्वास संपादन केला. प्रज्ञा गुरव यांना त्यांच्यावर करणी असल्याचे सांगून फसवणूक करत 3 हजार 600 रुपये उकळले. हा प्रकार प्रज्ञा यांचे जावई दीपक रामचंद्र पवार यांच्या लक्षात येताच त्यांनी महाड शहर पोलीस ठाण्यात फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार महाड मध्ये फिरणाऱ्या दोन वासुदेवांना ताब्यात घेतले आहे. लखन अशोक गोंड (वय 35 . जोशीवाडा – बारामती ) व ज्ञानेश्वर कचरू गंगावणे ( वय 32 ,मेडद बारामती ) अशी या वासुदेवांची नावे आहेत . या  दोघांकडून पोलिसांनी  43 हजार  रुपये ताब्यात घेतले आहेत. प्रज्ञा यांच्यासह इतर साक्षीदारांची देखील फसवणूक झाल्याचे पोलीस निरीक्षक शैलेश सणस यांनी सांगून ज्यांची ज्यांची अशा प्रकारे फसवणूक झालेली आहे त्यांनी महाड शहर ' पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे आवाहन देखील केले आहे.

.............

आता अलिबाग, मुरुड-जंजिरा आणि श्रीवर्धन ‘ब वर्ग’ पर्यटनस्थळे


आता अलिबाग, मुरुड-जंजिरा आणि श्रीवर्धन ‘ब वर्ग’ पर्यटनस्थळे 

रायगड , ता .१४

जिल्ह्यातील अलिबाग, मुरुड-जंजिरा आणि श्री .वर्धन या पर्यटनस्थळांना ‘ब वर्ग’ पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यात येत असल्याची घाेषणा नुकतीच शासनाने केली आहे . यामुळे रायगड जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायाला अधिक चालना मिळणार आहे.

 मुंबई, पुण्यापासून जवळ असलेल्या रायगड जिल्ह्यातील या पर्यटनस्थळांच्या विकासास चालना देण्याच्या अनुषंगाने राज्य शासनामार्फत हा निर्णय घेण्यात आला आहे. यास पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.या पर्यटनस्थळांना आता 'ब' वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा मिळाल्याने शासनामार्फत येथे विविध पर्यटन सुविधा, पायाभूत सुविधांचा विकास करण्यात येईल. यामुळे येथील पर्यटनाला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल, असा विश्वास पालकमंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केला आहे.  अलिबाग हे विस्तृत समुद्रकिनारा लाभलेले निसर्गरम्य पर्यटनस्थळ आहे. समुद्रातील शिवकालीन ऐतिहासिक कुलाबा किल्ला, सरखेल कान्होजी राजे आंग्रे यांची समाधी, 150 वर्षे जुनी ब्रिटीशकालीन वेधशाळा, श्री कनकेश्वर, श्री सिद्धेश्वर, श्री रामेश्वर, श्री बालाजी मंदिर, श्री काशी विश्वेश्वराचे मंदीर इत्यादी शिवकालीन पुरातन मंदिरे, ज्यू समाजाचे प्रार्थना मंदीर, हिराकोट किल्ला व तलाव, खांदेरी-उंदेरी किल्ले इत्यादी ऐतिहासिक पर्यटनस्थळे येथे आहेत. त्याचप्रमाणे मुरुड - जंजिराची भौगोलिक स्थिती आकर्षित करणारी आहे. शहरात प्रवेश करतानाच नवाबी नजाकतीचा राजवाडा दृष्टीस पडल्यानंतर पुढे अथांग अरबी समुद्र आहे. समुद्रात पद्मदूर्ग आणि विलोभनीय मुरुडचा समुद्र किनारा दृष्टीपथास पडतो. शहराच्या वेशीवर श्री कोटेश्वरी ग्रामदेवतेचे तर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी श्री भोगेश्वर मंदीर तसेच श्री लक्ष्मी नारायण व इतर पुरातन मंदिरे आहेत. मुरुड-जंजिरा हा ऐतिहासिक जलदूर्ग असून या जलदूर्गास देशविदेशातील लाखो पर्यटक भेट देतात. जवळच असलेले फणसाड अभयारण्य आणि खोकरी टॉम्ब हीदेखील पर्यटकांची आकर्षणस्थळे आहे.  श्रीवर्धन शहरात कालभैरव, जीवनेश्वर, सोमजादेवी, कुसुमावती इत्यादी देवस्थाने व पेशवे मंदीर इत्यादी वास्तू पेशवाई किंवा त्या अगोदरच्या काळातील आहेत. तसेच श्रीवर्धन येथे सुमारे 4 किमी लांबीचा नयनरम्य असा समुद्रकिनारा असून येथे मोठ्या प्रमाणावर पर्यटक भेट देतात.राज्य शासनामार्फत कोकणातील पर्यटन विकासाला चालना देण्यात येत आहे. यासाठी राज्य शासनामार्फत "बीच शॅक" धोरणास नुकतीच मंजूरी देण्यात आले आहे. या धोरणांतर्गत रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील वर्सोली समुद्रकिनारा आणि श्रीवर्धन येथील हरिहरेश्वर समुद्रकिनाऱ्याचा विकास करण्यात येणार आहे.  कोकणातील इतर जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांचाही या धोरणांतर्गत विकास करण्यात येणार आहे. 

..........

गुरुवार, ४ फेब्रुवारी, २०२१

रात्यात 20 ठिकणी पर्यटन महोत्सवांचे आयोजन

 पर्यटन संचलनालयामार्फत राज्याच्या विविध भागात 20 पर्यटन महोत्सव


मुंबई, ता . ४    

राज्य शासनाच्या पर्यटन संचालनालयामार्फत राज्यातील कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या सहा विभागांमध्ये विविध 20 पर्यटन महोत्सवांचे आयोजन करण्यात येणार आहे. राज्यातील पर्यटनाला चालना देण्याच्या अनुषंगाने फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांत हे आयोजन करण्यात येईल.

या महोत्सवांमध्ये नाशिक जिल्ह्यात ग्रेप हार्वेस्टींग महोत्सव, नांदूर मधमेश्वर महोत्सव, अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा भागात काजवे महोत्सव तसेच धुळे जिल्ह्यात लळींग किल्ला महोत्सवाचा समावेश आहे.पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर द्राक्ष महोत्सव, सातारा जिल्ह्यात वाई महोत्सव तसेच कोल्हापूर जिल्ह्यात पन्हाळा महोत्सवाचा अनुभव घेता येईल.कोकणामध्ये सिंधदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ला (सागरेश्वर) महोत्सव, रायगड जिल्ह्यात श्रीवर्धन महोत्सव, रत्नागिरी जिल्ह्यात कातळशिल्प महोत्सव तसेच वेळास/आंजर्ले महोत्सवाचा आनंद घेण्याची संधी पर्यटकांना मिळणार आहे.औरंगाबाद विभागाने काही लोकप्रिय महोत्सवांचे आयोजन करण्याचे निश्चित केले असून त्यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यात तेर महोत्सव, बीड जिल्ह्यामधील कपिलधारा महोत्सव तसेच नांदेड जिल्ह्यातील होट्टल महोत्सवाचा समावेश आहे. अमरावती विभागात बुलढाणा जिल्ह्यात सिंदखेड राजा महोत्सव, अकोला जिल्हात नरनाळा किल्ला महोत्सव तसेच यवतमाळ जिल्ह्यात टिपेश्वर अभयारण्य महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.नागपूर विभागाकडूनही विविध महोत्सवांचे आयोजन होणार आहे. यामध्ये नागपूर जिल्ह्यातील रामटेक महोत्सव, बोर धरण आणि वन्यजीव महोत्सव आणि गोंदिया जिल्ह्यातील बोधलकसा पक्षी महोत्सव यांचा समावेश आहे..

.........................................................

राज्यातील फारशी लोकप्रिय नसलेली ठिकाणे महाराष्ट्राच्या पर्यटन नकाशावर आणण्याचा उद्देश आहे. राज्याची भटकंती करण्याची संधी या महोत्सवातून उपलब्ध करून देण्यात आली आहे डॉ. धनंजय सावळकर ( पर्यटन संचालक )

.......

.

बुधवार, ३ फेब्रुवारी, २०२१

रायगडकर केकच्या प्रेमात

 

रायगडकर केकच्या प्रेमात 


सुनील पाटकर

चॉकलेट ,पायनॅपल , ब्लॅक करंट यासह विविध प्रकारांच्या केकच्या प्रेमामध्ये सध्या रायगड कर पडले असून  जिल्ह्यामध्ये केकच्या दुकानांची तसेच उलाढालीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहे .
केकचे नाव घेतले कि अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते .बच्चे कंपनीला तर केकचा मोह आवरता येत नाही .वाढदिवसाला सर्रासपणे कापले जाणारे केक आता घरोघरी वेगळ्या कारणांनी व समारंभासाठी दिसू लागले आहेत. कोणत्याही प्रकारच्या निमित्तसाठी अगदी लग्न समारंभातही केक कापण्याची प्रथा आता रूढ होऊ लागली आहे.पूर्वी बेकरीच्या बरणीत कपमध्ये दिसणारा  केक आता विविध आकार व चवीत दिसू लागला आहे .या सर्वांचा परिणाम रायगड जिल्ह्यातील बाजारपेठेवर होत  आहे . गेले वर्षभरामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये केकच्या दुकानांचे प्रमाण वाढू लागले आहे .यापूर्वी केवळ बेकरीमध्ये केक मिळत असे.परंतु आता केकची स्वतंत्र दुकाने उघडली जात आहेत.
 मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण होऊ लागल्याने अनेक नामांकीत ब्रँड रायगड कडे वळू लागले आहेत. मॉन्जीनीस , दिंशॉ, इलाईट यासारख्या देशभरातील ब्रँड प्रमाणेच रायगड जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या मयूर बेकरीची ही केक शॉपी जिल्ह्यात पसरत आहेत .यामुळे रायगडकर आता केकच्या प्रेमात पडलेले आहे. जिल्हयामध्ये मागील काही महिन्यात सुमारे 42 नवीन केकची दुकाने उघडली गेली आहेत. यामुळे सुमारे दोनशे स्थानिकांना रोजगार मिळाला आहे . रायगड जिल्ह्यात 145 केकच्या दुकानातून वार्षिक सुमारे पाच ते सहा कोटीची उलाढाल होत असते . कंपन्याचे टेंपो केक घेऊन जिल्ह्यातील सर्व दुकामात रोज पुरवठा करत असतात .
वाढदिवसा साठी लागणारे मोठे मोठे केक घरी नेले जात असतातच परंतु त्यापेक्षाही या दुकानांमध्ये येऊन पेस्ट्रीज खाण्याचे प्रमाणही वाढलेले आहे. महिला वर्गामध्ये ही केकच्या क्लासेसचे ही वाढलेले आहेत . अनेक महिला घरी केक बनवून सोशल मीडियावर त्याचे छायाचित्र प्रकाशित करून आपल्या केक ची विक्री करत असतात . अशा महिलानाही ही चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळत आहे .
काही दुकानदार एक तासा मध्ये आपल्या नावा सहीत केक तयार करून देत असतात केकच्या या बाजारपेठेत मोठा केक .कप केक,पेस्ट्रिज , डोनट्स, मफीन्स याचे 100 हून अधिक केकचे प्रकार उपलब्ध आहेत.
.........
केकचे प्रकार तरी किती ?

मँगो .व्हॅनिला ,चॉकलेट,मावा, पायनापल,स्ट्रॉबेरी, अलमौण्ड,ओरँज, बनाना,कोकोनट, रसमलाई,लिची, पिस्ता,मिक्सफ्रूट,,गनाश,ट्रफल,रेड वेल्वेट चीज क्रीम,पिनाकोलाडा, .केशर ,फालुदा,रोजफालुदा,पिस्ताफालुदा,मोजीतो 
 मन्गोंमलाई,ब्लूबेरी, वेरीबेरी,रबडी, मैंगोग्रीन, वेलची,बटरस्कॉच, कालाखाट्टा, पाइन अॅपल, रूहअफ्जा,चेरी, ब्लैककरंट,रेडरोज, रम, पानमसाला, ब्लैकफ़ोरेस्ट, व्हाइटफ़ोरेस्ट
,,,,,,,,

वरंध घाटाच्या दुरुस्तीची प्रतीक्षा संपली , काम सुरू

 वरंध घाटाच्या दुरुस्तीची प्रतीक्षा संपली , काम सुरू

महाड , ता . 3 



महाड पुणे व पंढरपूर मार्गावरील वरंध घाटाच्या  दुरुस्तीचे काम अखेर  पाच महिन्यांनंतर सुरू  झाल्याने प्रवासी व वाहन चालकांना दिलासा मिळाला आहे. 

वरंध घाटातील  संरक्षक भिंत व दुरुस्ती  कामाचे भूमिपूजन  आमदार भरत गोगावले यांच्या हस्ते  2 फेब्रुवारीला करण्यात आले . यावेळी  सहसंपर्कप्रमुख विजय सावंत  ,महाड तालुका प्रमुख सुरेश महाडिक  ,महाड सभापती सपना  सुभाष मालुसरे, जि.प सदस्य मनोज काळीजकर व संजय कचरे,  सुभाष मालुसरे, अनिल मालुसरे,  उपस्थित होते  .

मागील वर्षीच्या पावसाळ्यामध्ये वरंध घाटातील संरक्षक भिंत व रस्ता असल्याने येथील वाहतूक विस्कळीत झाली . सध्या अवजड वाहतूक बंदी असून केवळ हलकी वाहने येथून जात आहेत .

कोकण व पश्चिम महाराष्ट्राला  जोडणाऱ्या वरंध घाटातून महाड मार्गे पुणे तसेच फलटण पंढरपूर जाता येते . पुणे येथे जाण्यासाठी हा रस्ता जवळचा म्हणून वापरला जातो . महाड  परिसरामध्ये व्यापार, भाजी वाहतूक, एमआयडीसीमध्ये  कच्च्या पक्का मालाची  वाहतूक या घाटातून होत असते .परंतु गेल्या काही वर्षांपासून अरूंद असलेल्या या घाटात  पावसाळ्यामध्ये दरड कोसळणे .संरक्षक भिंती तसेच रस्ता खचणे असे प्रकार वारंवार घडत असल्याने घाट धोकादायक झालेला आहे मागील वर्षी  पावसाळ्यात घाटातील रस्ता खचल्याने व संरक्षण भिंत पडल्याने या घाटातील वाहतूक बंद करण्यात आली होती. सद्यस्थितीत या मार्गावर कमी वजनाच्या वाहनांची वाहतूक सुरू आहे. परंतु अवजड वाहने तसेच एसटी वाहतूक बंद असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत असते . एसटी प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करून  या घाटाला पर्याय असणाऱ्या ताम्हीणी व महाबळेश्वर मार्गे प्रवास करावा लागतो. परंतु आता वाहन चालक प्रवाशांचा हा त्रास कमी होणार आहे .महाड सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या घाटाच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आलेले आहे काम प्रगती पथावर आल्यानंतर घाटातील वाहतूक बंद केली जाण्याची शक्यता आहे .रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सुमारे तीन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून  प्रत्यक्ष रस्त्याच्या दुरुस्तीचे काम  सुरू झाले आहे. रस्त्याचे काम सुरू झाल्यानंतर प्रत्यक्ष वाहतूक पूर्णपणे बंद करण्याबाबत अधिकारी वर्ग अशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल अशी माहिती आमदार भरत गोगावले यांनी दिली.

.........

वरंधा घाटाच्या दुरूस्तीचे काम सुरू झाले असून घाटातील वाहतूक बंद करण्याबाबत जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार पुढील कार्यवाही केली जाईल आर .के .बामणे ( कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, महाड )

महाडमध्ये लवकरच नगरपालिकेची प्रशस्त इमारत

  महाडमध्ये लवकरच नगरपालिकेची प्रशस्त इमारत  महाड , ता .१४ दीडशे वर्षांहून अधिक वर्षांची परंपरा असलेल्या महाड नगर परिषदेची 8 कोटी रुपये खर्च...